सोमवार, २३ मार्च, २००९

कुठे म्हणालो परी असावी - प्रवासी

.

कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी

हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी

तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी

नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी

नको दिखाव्यास गोड गप्पा
मनात प्रीती खरी असावी

- प्रणव सदाशिव काळे "प्रवासी"

.

शनिवार, २१ मार्च, २००९

मुलाखत: मंदार चोळकर

नमस्कार कवितेच्या रसिकांनो.  आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण माझे आवडते कवी श्री. मंदार चोळकर यांनी मला मुलाखत दिली.  त्यांची मुलाखत आज तुमच्या समोर सादर करतोय.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?

या प्रश्नावर ते म्हणाले की मी साधारण २००४ पासून कविता करायला लागलो. मुळात मी कविता केल्या नाहीत.  सुरुवात मी चारोळ्यांपासून केली. ग.दि.मा. यांच्यावर आधारीत ' नक्षत्रांचे देणे ' हा ( अल्फा )झी मराठीवरील रंगमंचीय आविष्कार आणि एकूणच ग.दि.मांचं शब्दसामर्थ्य पाहून मी प्रभावीत झालो. आपणही काही तरी लिहावं असं वाटू लागलं.  मोठ्या कविता करण्या इतपत अक्कल आणि शब्द भांडार तेव्हा नसावं कदाचित माझ्याजवळ, म्हणून मी चारोळ्या करायला सुरुवात केली. आणि कमी शब्दात आपल्या विचारांच प्रतिबिंब मांडता मांडता हळू हळू माझं शब्दविश्व समृद्ध करत गेलो.  

पुढे साधारण २००६ च्या आसपास एक वेळ अशी आली की मला काही सुचेना !  मग मी माझ्याच चार ओळीच्या पुढे काही लिहीता येत का पाहिल,  त्यानुसार एक दोन प्रयत्न यशस्वी झाले, पण एकदोनच, कारण प्रत्येक चारोळीची कविता होत नसते.  हळुह्ळू मी स्वतंत्र कविता करायला सुरुवात केली.  त्यामुळे.... इथुनच (२००७) माझा 'कवितांचा प्रवास' सुरु झाला असं म्हणता येईल.

तुमच्या कवितांबद्दल सांगा:

कवीला आपल्या कवितेबद्दल काय वाटते ते ऐकणे खूप महत्वाचे.  मला मंदार त्यांच्या कवितेबद्दल काय म्हणतात याची खूप उत्सूकता होती.  त्यांच्या कवितांबद्दल एक विषेश गोष्ट त्यांनी सांगितली त्याने तर मी आश्चर्यचकित झालो.  त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते एक शब्द एकदाच वापरतात.  मला पण मग त्यांच्या कविता वाचून ते शब्द सामर्थ्यात किती प्रवीण आहेत हे समजले.

त्यांच्याच कवितांबद्दल ते ,म्हणतात की  माझ्या कवितांबद्द्ल सांगायचं झालं तर मी आशयघन कवित लिहीतो (concept oriented), खरं तर सगळेच तसं लिहीत असतील पण माझ्या कविता वाचताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवेल.

मी एका कवितेत एकदा वापरलेला शब्द पुन्हा वापरत नाही.  माझी सुरुवात चारोळ्यांपासून झाली....म्हणूनही असेल कदाचित.  मी जवळपास १०० च्यावर कविता केल्या आहेत
त्यापैकी दोन तीन कविताच या तत्वाला अपवाद आहेत.  गझल हा प्रकार सोडला तर इतर सर्व कविता प्रकार मी हाताळलेले आहेत, आणि जे मी लिहीलय त्यात मी समाधानी आहे.  मला माझ्या शब्दांचा माज आहे.  आणि प्रत्येक कलाकाराला तो आपल्या कलाकृती बद्दल असावा ( स्वभावात नव्हे ) या मताचा मी आहे. पण मीच एकमेव महान आहे...किंवा मी सर्वोत्तम लिहीलय असं नाही...

एक रचना पूर्ण झाली की काही क्षणातच त्यातली नवलाई आणि 'आपण फार काही छान लिहिलं आहे' हा आनंद माझ्यापुरता संपुन जातो.   मी विचार करतो त्या पेक्षाही सुंदर काही आणि कधी लिहीता येईल याचा.  माझं माझ्या शब्दांवर स्वतःच्या श्वासांइतकच प्रेम आहे.  बाकी माझ्या कवितेबद्द्ल मी बोलण्यापेक्षा इतरांनी बोललेलं जस्त चांगलं, .... नाही का ?

तुमचे आवडते कवी कोण?

आवडते कवी सांगताना ते म्हणाले की त्यांना ग.दि.मा., स्वातंत्र्यवीर सावरकर, शांताबाई शेळके,  कुसुमाग्रज हे विषेश आवडतात.  आजकालचा पिढीचा विचार करता त्यांना आवड अशी नाही... पण त्यातल्या त्यात संदिप च्या काही कविता त्यांना भावतात.

ते म्हणाले की वाचून कदाचित हसु येईल...पण मी स्वतः माझ्या स्वतःचा प्रचंड मोठा फॅन आहे.  स्पष्टच सांगायचं झालं तर गीतकार आणि कवी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.  उत्तम (प्रसिद्ध) गीतकार हा चांगला कवी असेलच असं नाही.  सकस शब्द लिहीणारी कुठलीही व्यक्ती त्या त्या कलाकृती संदर्भात मला आवडते...
 
शेवटी ते म्हणाले की अगदीच to the point बोलायचं झालं तर... ज्ञानेश्वर, ग.दि.मा., ग्रेस... यांना पर्याय नाही

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?

कवितांवर असणा~या प्रभावाबद्दल ते म्हणाले की माझ्या कवितांवर कुणाचाच प्रभाव नाही.  त्यांच्या म्हणण्या प्रमाणे त्यांचे वाचन कमी आहे म्हणून कदाचित त्यांच्या कविता या वाचणा~याला आपल्या वाटत असल्या तरीही त्यावर कुठल्याही लिहिणा~याची छाप नाही.

त्यांच्या बद्दल माहिती:

यांचे पूर्ण नाव मंदार शशिकांत चोळकर. राहणे दादर. मुंबई.

ते व्यवसायाने ग्राफिक डिझाईनर आहेत.  एका एडव्हरटाईझींग स्टुडियो मध्ये सिनीयर व्हिजुअलाईझर म्हणून काम करतात.  स्वतःबद्दल बोलताना ते म्हणाले कविता करणं हा माझा छंद.  माझ्याप्रमाणेच काव्यवेड्या मित्रमंडळीं सोबत स्वरचित कवितांचे जाहिर कार्यक्रम करतो. (http://www.thecreativebytes.com)

  • त्यांचा 'शब्दात माझ्या' हा चारोळी संग्रह जेष्ठ कवी श्री. गंगाधर महांबरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे ( नोव्हेंबर २००७)

  • डॉ. राहूल देशपांडे पुणे यांच्या प्रयत्नांनी साकार झालेल्या 'शरपंजरी आज मी' (महाभारत व्यक्तीरेखांवर आधारित) या ई-परिचयातून एकत्र आलेल्या कविंच्या पहिल्या वहिल्या काव्य-श्रुंखलेत त्यांचा 'एकलव्य' या लयगद्याचा समावेश करण्यात आला आहे.  महांबरे काकांच्या हस्तेच बरोब्बर एक वर्षाने म्हणजेच नोव्हेंबर २००८ मधे याच काव्य श्रुंखलेचा ब्रेल अनुवाद प्रकाशित झाला.  ते म्हणतात मझे शब्द आज अक्षरांच्या पलिकडे गेले आहेत याचा मला आनंद आणि अभिमान आहे.

  • ऑडवाटेच्या कविता या ऑर्कुट वरील काव्यांजली समुहाच्या कविता संग्रहात त्यांची 'पाथरवट' कविता प्रकाशीत झाली आहे.

  • पुण्याला जून २००८ मध्ये झालेल्या ' बरस रे मना ' या कार्यक्रमात त्यांच्या एका कवितेचं (ईशस्तवन) गीतात रुपांतर करुन त्यावर शास्त्रीय न्रुत्य सादर केलं गेलं.

  • जुलै २००८ मध्ये 'मी मराठी' वरुन सादर झालेल्या ' जोडी नं. वन' या कथाबाह्य मालिकेचं शिर्षक गीत त्यांनी लिहीलं आहे.

  • नाशिकला ऑगस्ट २००८ मध्ये झालेल्या ' बरस रे मना ' या कार्यक्रमात त्यांनी त्यांची एक कविता गीत रुपात सादर केली. त्याला संगीत पण दिले. 

  • सध्या दोन चित्रपटांसाठी आणि दोन अल्बम साठी , दोन मालिकांसाठी त्यांचे गीत लेखन चालू आहे.
स्वतः बद्दल सांगताना ते पुढे म्हणाले की मी गीतकार होण्याचा प्रयत्न करतो आहे.  बघुया...काय होतय ते... काही गुणी संगीतकारांनी आणि गायकानी माझ्या शब्दांचं सोनं केलय.  आणखिन गुणी संगीतकारांच्या शोधात आहे.
एवढच....आणखिन माझ्या बद्दल सांगण्यासारखं... माझ्या कडे काही नाही.

माझ्या सगळ्याच कविता मला खूप आवडतात.
काही पुस्तकात छान वाटतात
काही सादरी करणात...
काही गीत म्हणून तर ....
काही विचार म्हणून.
 
 
सहज म्हणून ही कविता देत आहे.
 
---- चैतन्याचे नूर द्या ----

गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
खंगलेल्या आत्म्यांना चैतन्याचे नूर द्या
देऊन वाळवंटांना दिशा....
सुजलाम् सुफलाम् पूर द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
 
उन्मत्त वादळाला संयमाचा वेग द्या
थांग द्या सागरा अन् आभाळाला रंग द्या
देऊन मोती शिंपल्यांना....
माती ला या मेघ द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
 
काळरात्री किर्र रानी द्या तमाला काजवा ,
मल्हार द्यावा बरसता अन् ओसरताना मारवा
रक्त, नाती, भाव, प्रिती....
जोडणारा दूवा द्या !
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या,
 
द्या मनाला शंतता, अन् माणूसकीला आर्त द्या
वास्तवाला श्वास द्या अन् स्वप्नास वेड्या अर्थ द्या,
नीर्णयाला पूर्तता अन्....
जींकण्याला शर्थ द्या !!
गंजलेल्या ओठांना सानिकेचे सूर द्या

शब्दशहा (मंदार चोळकर)
 
मंदार चोळकर यांच्या आणिक कवितांसाठी इथे भेट द्या.

ते म्हणाले की त्यांना टोपणनाव नाही. मंदार याच नावाने लिहीतो.  पण orkut related काव्यजगतात 'शब्दशहा ' म्हणून ही ओळखलो जातो  ( अर्थात हे title माझं स्वतः मला दिलेलं आहे ).  पण लवकरच शब्दशः - शब्दशहा या नावाने रंगमंचीय आविष्कार करण्याचा विचार आहे.

तर अश्या या शब्दशहा ने ही मुलाखत दिली म्हणून मी त्यांचा सदैव ऋणी असेन.

आपलाच 
अनुराग

शुक्रवार, २० मार्च, २००९

अमिताभ - सॅम अंकल

.

मोठे लोक भेटतात तसा
मीही भेटलो अमिताभला
माझी ओळख करुन द्यायला
त्याने बोलावलं ऐश्वर्याला

डोक्यावर पदर जमिनीवर नजर
मला स्वप्नंच वाटलं
मनात म्हटलं विश्वसुंदरीचं
गोडं वरण झालं

तिने केलेले पोहे हाणत 
आमच्या गप्पा भारी रंगल्या
ऐकुन माझ्या कविता त्यांनी
जोरात टाळ्या पिटल्या

निघताना मात्र अमिताभ
थोडा भावुक झाला
डोळ्यामधलं पाणी लपवत
अमिताभ मला म्हणाला

यार माझ्यातला ऍंग्रीयंगमॅन
कुठेतरी हरवलाय 
दुनियादारी करता करता
कुठेतरी भरकटलाय

म्हटलं बाबा तुझं काय
सगळ्यांचच तसं झालंय
संस्कार वगैरे जपता जपता
पुरुषत्व गहाण पडलंय

तुझं जरा बरं आहे 
तु खोटा तरी पेटुन उठलास
खोटया खोटया देशद्रोह्यांशी
खोटा तरी लढलास

मध्यमवर्गीय कवी मी 
मी काय करणार
पडद्यावर तुला लढताना बघुन
अंधारात शिट्टी मारणार

नेता, गुंड येता दारी
मी नम्र हात जोडणार
भ्रष्टाचारी सत्तेसमोर
मी मुकाट शेपुट हलविणार

ऐकुन माझे विचार 
अमिताभ दाढी खाजवत हसला
सिनेमासाठे स्टोरी लिही
अमिताभ, खरंच मला बोलला


.

बुधवार, १८ मार्च, २००९

नियम - योगेश जोशी (पुणे)

.

बेभान मन एकच छंद
जगायचंय मला प्रत्येक सेकंद

आले क्षण अन जातील किती
पारा निसटण्याचीच मला भिती
तेज साठवेन डोळ्यात, होण्याआधी बंद
जगायचंय..जगायचंय मला प्रत्येक सेकंद

शतदा प्रेम करावे ची धून
चांद्णे, दवबिंदू, पायल रुणझुण
फुलांचा वास घ्यायला कसले आलेत निर्बंध
जगायचंय..जगायचंय मला प्रत्येक सेकंद

तेच ते जगणे अन कंटाळवाणे रुटीन
उपाय एकच हरक्षणाला नव्याने भेटीन
नजर बदलता माझी, आयुष्य़ बदलेल सबंध
जगायचंय..जगायचंय मला प्रत्येक सेकंद

- योगेश जोशी (पुणे)

.

सोमवार, १६ मार्च, २००९

त्या वाळक्या काठीसोबत - प्रमोद खाडिलकर

.

बाजारच्या रस्त्यावरून जाताना 
मी नेहमी माझ्या मित्राच्या दुकानात जायचो.
सारखा तराजूच्या पारड्यांवर मोजमाप करत असायचा.
सर्हाईतपणे विचारायचा--
"कुठं चालला आहेस?"
माझं उत्तर ठरलेलं-
"व्रुद्धाश्रमात"
पुन्हा ठरलेला प्रश्न:
"का वेळ घालवतोस वाया,
तिथं जाऊन?"
मी हसायचो.
शेजारच्या टपरीतून चहा मागवून
म्हणायचा,
"काय होतं तू तिथं जाऊन?"
"त्यांना बरं वाटतं इतकंच,
जाणवतं की त्यांच्या वेदना जाणणारं
आहे कु्णीतरी"
तो उशीला रेलत
आणखी एक घोट घेत म्हणायचा
"मग, त्यानं काय होतं?"
मग मी नुसता शांत व्हायचो.
मनातनं त्याच्या
असंवेदनशीलतेवर चिडायचो.
तो म्हणायचा,
"वेदना का जाणवतात, ठाऊक आहे?
संवेदनेमुळे--
वेदना संवेदनेची असते. अरे--
एकदम व्यावहारीक जगावं,
नफ्या-तोट्याचं गणित
सारखं मांडत रहावं!
तूच सांग, महत्त्वाचं गणित की संवेदना?
तुझं गणित पक्कं म्हणून तुला मिळाली
नोकरी, की संवेदना पक्की म्हणून?"
मी हसायचो.
"कुणीतरी द्यावी लागते संवेदना,
परत मिळण्यासाठी,
आणि
एकदा अंकुरली की
वाढत जाते आभाळभर
ज्ञानोबाच्या वेलीसारखी"
तो हसायचा नुसता.
पोरावर डाफरत,
"चाय मे पानी कम डालो"
सांगत पैसे काढून द्यायचा.
गल्ल्यातून.

***

परवा खूप दिवसांनी
गेलो त्याच्याकडे.
कधी नव्हे तो 
तराजूवर काही मोजत नव्हता.
काय करतो आहेस?
"स्पंदनं ऐकत बसलो आहे स्वतःची"
तो म्हणाला.
जवळ जाऊन बघितलं
तर भलं मोठं प्लॅस्टर पायाला
आणि शेजारी
एक मळकट काठी.
ओबड धोबड.
काय झालं रे?
काळजीनं म्हणालो तेव्हा,
"चालत्या लोकलमधून पडलो,
तरी बरं-
स्लो होती. नाही तर
राम नाम सत्य होतं"
मग?
"नंतर बराच वेळ पडलो होतो.
विव्हळत.
९:१०ची, ९:१५ची, ९:१८ ची
९:२०ची सगळ्या लोकल 
जात होत्या.
माणसांनी भरलेल्या.
पण
नाही आलं कुणी वळून
मदतीला."
कुणीच नाही??
"नाही. लेट मार्कचा लाल रंग
गहिरा असेल कदाचित,
रक्तापेक्षाही"
मग?
"तिथनंच आला चालत
एक लंगडा भिकारी
कष्टानं.
दगडांतून.
त्यानं दिली त्याची काठी मला.
ठेशन धा मिन्टावर हाय, बोलला.
खूप कष्टानं आलो चालत. तोसुद्धा--
खुरडत, सरपटत.
मग ऍम्ब्युलन्स आली. कुणीतरी नेलं
हॉस्पीटलमधे.
या धावपळीत--
ही काठी, त्या भिका-याची.
राहिली रे माझ्याकडे.
कसा चालत असेल?
कसा पोट भरत असेल तो?
येशील माझ्याबरोबर?
शोधू आपण त्याला.
येशील?"
चल.
उठला कष्टानं. 
तीच भिका-याची काठी घेत.
ओबडधोबड.
रीक्षानं जाताना,
ती काठी होती माझ्या हातात.
जाणवलं--
अचानक त्या ठार कोरड्याखट्ट काठीला
पानं फुटत आहेत--
वाढत्येय ती. बहरते आहे.
आभाळापर्यंत.
रीक्षातनं बाहेर 
शून्यात बघणा-या मित्राकडे 
नजर वळाली.
ज्ञानोबाच्या झाडाचं बी
रुजत होतं कुठेतरी त्याच्या काळजात.
त्या वाळक्या काठीसोबत.
ओबडधोबड.


.

शनिवार, १४ मार्च, २००९

माझ्या मातीचे डोहाळे - हरीश दांगट

.

माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश
भर दुपारीस झाला , तिन्ही सांजेचा प्रकाश 

वादळाचा झाला जोर, झेली धरणी प्रहार 
उणे फेडायाच्या साठी, झाडे घेती कैवार
विज कडाडून उजळी , अवघे अवकाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

रानवारा झाला धुंद, सुटे केतकीचा गंध
झेंडू पडला आडवा, चुर झाला निशीगंध
सार्‍या लिंबोळ्या गळून , लिंब झालासे निराश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

विज कडाडे आभाळी, जुने छत अश्रु ढाळी
पिंपळाच्या पारावर, आली तुटून डहाळी
वड हालेना जागचा, पारंब्यांचा बाहूपाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश

आला मातीला पाघळ, तिचे वाहती ओघळ
नदी वाहते भरुन, ओढा करीतो खळाळ
रुजलेल्या बियान्यास, माती घाली मोहपाश
माझ्या मातीचे डोहाळे, आले भरुन आकाश


March 11, 2009

.

शुक्रवार, १३ मार्च, २००९

हे सार असच बयो - सोनाली घाटपांडे

.

हे सार असच बयो
माहितेय मला
भांड घासता घासता
हात थबकतो तुझा,
पुन्हा पुन्हा
भांड्यावर घातलेल्या नावापाशी!!

ज्याच्या नावे कुंकू कोरतेस
नित्यनियमानं कपाळावर
त्याच्या शर्टाच बटण शिवता शिवता
पुढचा टाकाचं घालावा वाटत नाही तुला

पण तुझ मन मोठं
तोच टाका दुप्पट शक्तीने घालतेस
जणू तो सातजन्मी
उसवूच नाही

इडापिडा टळो म्हणत
देवापाशी दिवा लावतेस
पावलांचा वेध घेत राहतेस
सुफळ संपूर्ण कहाणीचा

खरा शोध तुला तरी लागलाय बयो??
आणि मला तर आजही स्मरतय
पोत्यात पाय घालून पळायच्या
आपल्या दोघीच्या शर्यतीत
.
.
.
तूच नेहमी जिंकायचीस बयो!!!


.

गुरुवार, १२ मार्च, २००९

पार - अहं ब्रह्मास्मि

.

व्याकुळला जीव,
येण्या तुजपाशी.
जन्म-जन्मांचा तो,
राहिला उपाशी.
 
मागतात प्राण,
तुझा एक थेंब.
तहानल्या जीवा,
नको ठेऊ लांब.
  
तुझ्या वाटेकडे,
लावले हे डोळे.
तोडुन मी आलो,
मायेचे हे जाळे.
  
खेळ खेळण्याचे,
दिन ते सरले.
मोहाचे ते जग,
आता ना उरले.
  
सारे भोगुनिया,
जाणिले असार.
नाव आता माझी,
लाव तुच पार.


.

मंगळवार, १० मार्च, २००९

मुलाखत: विजयकुमार

विजयकुमार यांची मुलाखत सादर करताना मला आनंद होतो आहे.  विजयकुमार यांच्या कविता मी ब~याच दिवसांपासून मराठी कविता या ऑरकूट कम्यूनिटी मधे वाचतो आहे.  आज त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या मनातली बात जाणून घ्यायला मिळाली.  सुरेश पेठे काकांनी मागच्या मुलाखती वाचून काही सूचना केल्या म्हणून त्यांचे आभार.  सगळ्यांच्या आशिर्वादाने साहित्य पत्रकारीता करायला पण मजा येते आहे.  सुरेश काका मी तुमच्या सूचना पुढच्या मुलाखती पासून अमलात आणायचा प्रयत्न करेन.  चला तर आपण विजयकुमार यांच्या मुलाखती कडे वळूया.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
विजयकुमार म्हणतात "कॉलेज मधे असल्यापासून कविता करत आहे. काही तरी सुचते म्हणून लिहीत असे परंतु त्या व्यवस्थित जपून ठेवाव्या असे वाटले नाही त्यामुळे त्या वेळी लिहिलेल्या काहीच कविता संग्रही आहेत."

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
स्वतःच्या कवितांबद्दल बोलताना ते म्हनाले, "माझ्या कविता ह्या मानवी भाव भावनांचे विविध पदर उलगडणार्‍या असतात. मागे सुटलेले गाव, जीवनात होणारे अनाकलनीय बदल, कळानुरुप बदलत जाणारी जीवनशैली ह्या गोष्टी माझ्या कवितेत जास्तीत जास्त डोकावतात. नाकारलेल्यांचे, विस्थापितांचे , वंचितांचे दुःख मला पिळवटुन काढते मग ते सगळे माझ्या कवितेत उतरते. माझ्या कविता ह्या अनुभवावर आधारित जास्त असतात त्यात गरजेचे नाही की ते अनुभव माझेच असायला हवेत. मानवी मनोव्यापाराचे चित्रण मला करायला जास्त आवडते.  त्यातून माणूस म्हणून इतराना आणि स्वत: ला समजून घेण्याचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे."

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
त्यांच्या कविता वाचून त्यांना ग्रेस आवडत असावेत हा माझा ठोकताळा अगदी खरा ठरला.  ते म्हणाले , "मी आधी म्हटल्या प्रमाणे विविध अनुभवांचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे. मराठीतील सगळे लेखक मी वाचले आहेत. माझ्या कवितेवर कवी ग्रेस ह्यांचा प्रभाव आहे. मी त्यांच्या पासून आत्यंतिक प्रभावित झालो आहे. त्यांची गूढता मला भावते. उत्कृष्ट शब्द वापरुन कवितेला उत्तम दर्जा देण्याची आणि योग्य ती खोली प्राप्त करून देण्याची ताकद ग्रेस ह्यांच्यात आहे . ते सदैव माझे प्रेरणास्थान राहीले आहेत. लेखक म्हणून मला श्री. ना पेन्डसे खूप आवडतात.  विश्राम बेडेकर हे ही तितकेच आवडतात. माझ्या आई कडून मी खूप काही शिकलो तिच्या आणि ती ज्या पध्दतीने जगली त्या जगण्याचा माझ्या कवितेवर प्रभाव आहे ."

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
आधी म्हटल्या प्रमाणे कवी ग्रेस हे माझे प्रेरणा स्थान आहेत. ते मला जास्त भावतात. विंदा करंदीकर आणि ना धो महानोर ह्यांच्या रचना मला आवडतात.  गुलजार ह्यांची तरलता आवडते.

तुमच्या बद्दल अधिक माहिती
माझे नाव विजयकुमार कणसे आहे. मी पुनश्च हरि ओम ह्या नावाने कविता लिहितो. मी एक छोटासा व्यावसायिक आहे. माझे बालपण सातार्‍या जवळील एका गावात गेले. पुढे शिक्षणा साठी मुंबई इथे आलो. वडिलांचा व्यवसाय ही मुंबई मधे होता त्यामुळे  मुंबई मधे आलो. शाळा आणि कॉलेज मुंबई मधेच झाले.  मी अर्थशास्त्र आणि इतिहास ह्या विषयात एम. ए केले आहे.

तुम्हाला आवडणारी तुमची एक कविता 
माझ्या सगळ्याच कविता माझ्या आवडत्या आहेत त्यातील एक निवडणे म्हणजे आईला विचारण्यासारखे आहे तुम्हाला कोणते मूल जास्त आवडते. तरीही आपल्या आग्रहाखातर मी इथे एक माझी कविता देत आहे.

आत्मनिवेदन
संमोहित मनाच्या दुखर्‍या
गाभार्‍याला स्पर्श
करून सांगतो
हे आत्मनिवेदन सत्य
आहे !

पहाटे उमलुन
पहिल्या प्रकाश किरणात
कोमेजणार्‍या बकुळफुलांच्या
संचिताच्या शापासारखे
हे जगणं
अन् क्लेश
नवसाचं रूपं
देवीच्या उंबरठ्यावर
ठोकावं असं
पूर्व परंपरेने चालत आलेलं !

संध्याकाळी मी जेव्हा
डोळ्यावाटे रक्त वाहतो
तेव्हाच
तुझे पारसदार
लालभडक होते
पसरलेले लाल
अन्
येणारे कृष्णमय
ह्याच्या संगमाने जे काही
क्षिताजावर उमटते
त्याला शब्द नसतात
त्याच अवस्थेत
मी असतो
ह्यासाठी पाहिजेतर
मी माझ्या पहिल्या
कवितेच्या गर्भपाताची
शपथ घेतो !

शेवारीच्या कापसात
विधवेची रात्र गुंडाळून
विरह आग आग
होऊन
रात्र जाळतो
मग झोप परागंदा
होते
अन्
मी नागव्याने
पिंपळपाराकडे
वळतो
पूर्वजन्मीच्या पापापासून
मुक्त होण्यासाठी
अनंत प्रदक्षिणेच्या शोधात !


23 / 02 / 2009

विजयकुमार यांच्या अधिक कविता त्यांच्या ऑरकूट वरच्या हुंकार वेदनेचे या कम्यूनिटीवर वाचायला मिळतील.

सोमवार, ९ मार्च, २००९

आशिर्वाद देहि - रणजीत पराडकर

.

हा जीव ना जळावा 
अमृतास प्याया 
हे घोट जीवनाचे 
मजला मधुर व्हावे 

मी घोट-घोट घ्यावे 
जे प्राशले, पचावे
रानात मोर नाचे 
ते वागणे असावे 

कोणास ना कधीही 
फसवून मी हसावे 
अन् भाट होउनीही
मी ना कधी झुकावे 

उधळीत रंग यावे 
उधळून तृप्त व्हावे 
जिंकून मैफलींना 
मागे सुखी उरावे 

ना संत मी न थोर
बाहूंत क्षीण जोर 
लाटांवरी तरुनी 
मी फक्त पार व्हावे 

देवा तुझ्या कृपेने 
सुखवंत आज आहे
शब्दांस एकदाही 
वाया न घालवावे

आयु सरून जाई 
नच मित्र एक लाभे 
मज लाभले परि जे 
कश्चित् न दूर जावे

आशिर्वाद देहि 
तुज सर्वदा स्मरावे 
माणूस तू घडवले 
माणूस मी रहावे 

०१ मार्च २००८

.

रविवार, ८ मार्च, २००९

अवघड वाट - महेश घाटपांडे

.

जखमा सुगंधी आहेत म्हणुन
जन्मभर जपतो आपण
आभाळाच्या कुशीत शिरुन
ढगात दूर लपतो आपण...
...
छप्पर असतं, भिंती असतात
पण भान नसतं आपल्याला
पापण्या सुद्धा बंद पुकारतात
आसवांचे ओझे पेलायला...

अश्यावेळी,

अश्यावेळी आपण शोधतो
शीतल पाण्याचा एक पाट
त्यासाठी आपल्याला मंजुर असते
काटेभरली अवघड वाट..
...
आश्चर्य आहे ना...?



.

शनिवार, ७ मार्च, २००९

मुलाखत: संतोष बडगुजर

नमस्कार मंडळी,

आज संतोष बडगुजर यांची मुलाखत सादर करतोय. सुबोध साठे यांच्या साईट वर अजूनही कळेचना हे संतोष बडगुजर यांचे गाणे सध्या गाजतेय, आणि हेच गाणे कुणाल गांजावाला यांच्या आवाजात लॉटरी लागली रे या चित्रपटात घेतले गेले आहे.  संतोष बडगुजर यांचे आवडणा~या कविता ब्लाग तर्फे अभिनंदन.  चला तर मग संतोष बडगुजर यांना काही प्रश्न विचारूयात.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
कवितांच वेड तस फार पुर्वीपासुनच, जेव्हा कळायला लागल अगदी तेव्हापासुनच, सहावी सातवीत असेन तेव्हा ह्या वेडाला अजुन गती मिळाली आणि ती आजतागायत कायम आहे.

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा
मला विशिष्ठ प्रकारात लिहीत रहाण आवडतच नाही. जेव्हा जे सुचेल आणि जस सुचेल तस लिहीत रहातो. त्यात गझल हा अगदी जिव्हाळ्याचा काव्यप्रकार.

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
मंगेश पाडगावकर, सौमित्र, सुरेश भट हे माझे आवडते कवी .. पण बरेचदा चटका लावुन जाणाऱ्या ग्रेसच्या कविताही खूप आवडतात. याशिवाय वि. स. खांडेकरांच्या लिखाणातली जादु अजुनही भुरळ पाडते

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
माझ्या कवितांवर प्रभाव असतो तो वाचनात किंवा अनुभवात आलेल्या काही घटनांचा, किंवा बरेचदा तर एखाद्या आवडलेल्या कवितेचाही.

तुमच्या बद्दल माहिती द्या
माझे नाव संतोष बडगुजर, संतोष .. कवितेतला या नावाने बरेच लिखाण केले, लहानपनापासुन वाचनाची भयान आवड होती. त्याचीच छाप बरेचदा कदाचीत माझ्या कवितांमधुनही दिसत असावी. जन्मगाव पुणे.

संतोष बडगुगर यांना आवडणारी त्याची एक कविता


अजुनही कळेच ना
कश्या कळ्या फुलेच ना
अजुन वाट पाहतो
तुझी छटा दिसेच ना

अजुनही असा कसा
उदास चंद्रमा नभी
अजुन रात एकटी
अशी कशी ढळेच ना

दुर कुठुनीतरी
गातसे कुणीतरी
अजुन श्वास मारवा
सुरांतुनी भरेच ना

चांदणे नभातले
भान आज हरपले
चांद एकटा नभी
का मला कळेचना

सोड तु अता सखे
लाजणे फुलापरी
श्वासही जरा जरा
बंदिशी भरेचना

काय रात बोलते
सांगतो तुला अता
स्पर्श वाहता तुझा
मी मला भुलेचना

कोणता खरा खुरा
मोगरा मनातला
कोणती अनोळखी
स्पंदने कळेचना

भासही तुझा सखे
आज हासतो मला
पाहता समोरूनी
पापणी भिडेचना

शुक्रवार, ६ मार्च, २००९

लक्ष्मणरेषा - विजय कुमार

.

प्रत्येकाची एक लक्ष्मणरेषा असते
माझ्याजवळ येताना
आपण धोक्याची पातळी 
ओलान्डतोय याचे भान राखा.......

मी उभारलेल्या माझ्या तटबंदीत
माझे साम्राज्य आहे !
माझ्या कवितेला 
काळोख्या रात्रीची ओढ आहे !

तुमचे दिप इथे आणू नका,
माझ्या अंधाराला भ्रष्ट करू नका !
ह्या अंधारात रक्ताचे दिप जळतात !
त्या धगीत माझी कविता बहरते !

तुमच्या लक्ष्मणरेषेत तुम्ही रहा !
माझी लांघु नका ....
नव्या वादळाला आमंत्रण देऊ नका !

मला जगू द्या तटबंदीत,
पीऊ दे माझ्या कवितेस अंधार !
मीच जर धोक्यात जगतोय
तर
तुम्हास इथे मी का ओढू ?

०४.०६.२००८

.

गुरुवार, ५ मार्च, २००९

मुलाखत: अनुराधा म्हापणकर

नमस्कार रसिकहो.  आवडणा~या कवितांच्या ब्लाग वर मी अनुराग तुमचे स्वागत करतो. आवडणा~या कविता ब्लाग वर असलेल्या अनेक कवितांपैकी एका कवितेची कवियत्री अनुराधा म्हापणकर यांची आस्मादिकांनी मुलाखत घेतली आणि तीच मुलाखत रसिक दरबारात सादर करतोय.  कविता करताना या प्रतिभावंतांना नक्की काय अभिप्रेत असतं.  हे स्वतःसाठी कविता करतात की लोकांसाठी? असे अनेक प्रश्न मला पडतात.  या मुलाखती व्दारे मी माझ्या प्रश्नांची सरबत्ती अनुराधा दिदींना पाठवली. त्यांनी आवडणा~या कविता ब्लाग साठी ही मुलाखत दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे.

तुम्ही कविता कधी पासून करायला लागलात?
कविता कधी पासून करायला लागलात या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "माझी पहिली कविता आठवत नाही.  आठवतंय ते एवढं की शाळेत, कॉलेजात असताना माझ्या निबंधाचं कौतुक व्हायचं.  माझी लाडकी आजी मी दहावीत असताना गेली.  तिच्यावर खूप कविता केल्या होत्या ज्या वाचताना आजही तिच्या आठवणींनी रडू येतं. पण त्याआधी नक्कीच कधी तरी कदाचित चौथी पाचवीतच कविता केल्याची ठळक आठवण आहे.  पण ती संग्रही मात्र नाही.  त्यानंतर जे लिहिले ते रूढार्थाने कविता नाही.  पण मैत्रीणींच्या / नातेवाईकांच्या वाढदिवशी विकतचे ग्रीटींग्ज घेण्यापेक्षा कविता करत गेले."

तुमच्या कवितांबद्दल काही सांगा?
स्वतःच्या कवितांबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, "माझ्या कविता नियमीत वाचणारे वाचक म्हणतात, माझ्या कविता रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगांबद्दल बोलतात.  सर्वसामान्य माणसाच्या जिवनातले अगदी उठण्याबसण्यातले प्रसंग.  म्हणून कदाचित वाचणा~याला त्या जवळच्या वाटत असाव्यात (किंवा convincing, in other words).  मला वाटतं मी प्रत्येक कविता करते तेव्हा तो एक अनुभव असतो.  मी स्वतः जगलेला किंवा मग त्या व्यक्तिरेखेत शिरून अनुभवलेला.  माझी कविता ही बहुधा माझी स्वतःची विचार करण्याची पद्धत असावी.  मी माणसांत, माणसांच्या जगण्यात माझ्या कवितेला पहाते.  म्हणूनच कदाचित निसर्ग, झाडं, पानं, यापेक्षा माणसांच्या कविता अधिक करते."

तुम्हाला कोणते कवी अधिक आवडतात?
आवडणा~या कविंबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "पर्टिक्युलरली एखादा कवी किंवा कवियत्री आवडते म्हणण्यापेक्षा त्यांच्या काही कविता खास करून आवडतात.  किंवा त्याही पलिकडे जाऊन कवितेतल्या काही ओळी मनात खूप घट्ट बसतात.  अगदी खास नाव घ्यायचं तर: सुरेश भट, गदिमा.

तुमच्या कवितांवर कुणाचा अधिक प्रभाव आहे असे तुम्हाला वाटते?
कवितेवर असणा~या प्रभावाबद्दल त्या म्हणाल्या की, "आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्या कविता, म्हणजे मी जगलेले क्षण आहेत.  किंवा जवळचे अनुभव आहेत.  माझ्या कविता माझ्या जगण्याचा आरसा आहे.  म्हणूनच माझ्या कवितांवर प्रभाव असेलच तर तो माझ्या सभोवतालच्या माणसांचा.. आणि सभोवती घडणा~या प्रसंगांचा.

स्वतःबद्दल सांगतांना त्या म्हणाल्या की त्यांचे नाव सौ. अनुराधा सचिन म्हापणकर.  त्या पूर्वाश्रमीच्या कु. अनुराधा नार्वेकर.  त्यांचे टॊपण नाव अनू आणि त्यांच्याच शब्दात जन्म देऊन मोठ करणारं आणि सर्व काही देणारं गाव म्हणजे मुंबई.  स्वतःबद्दल त्या असेही म्हणाल्या की त्यांच एक अगदी साध सोप्प चाकोरीतलं सिक्युअर्ड आयुष्य आहे असे त्यांना वाटते.  शिक्षणाच्या वेळी शिक्षण, मग नोकरी, वेळेत विवाहवेदी, वेळेत अपत्यप्राप्ती आणि चाललंय एक छानसं साधं सरळ आयुष्य.

त्यांची आवडती त्यांचीच एक कविता म्हणजे "चर्चगेट - विरार लोकल" .  चला मग या मुलाखतीचा समारोप त्यांच्या या  कवितेने करूया.

चर्चगेट - विरार लोकल

लोकलच्या गर्दीत एकदा माझा हातच हरवला...
खूप शोधला तेव्हा लांब कुठे पुसटसा दिसला...

वरच्या कडीला दोन हातांबरोबर लोंबकळत होता..
नखांना त्याच्या काल मी लावलेल्या पेंटचा कलर होता...

पण हाय.. तो माझा हातच नव्हता..
हलवून खूप पाहिला तरी हलतच नव्हता..

उतरायची वेळ झाली तरी हात काही मिळेना..
कुठे शोधू.. कशी शोधू.. काही काही कळेना..

शेजारणीला म्हटलं.. हात माझा शोधून दे..
ती म्हणे.. माझा पाय तरी मिळू दे..

तिची बिचारीची मला किव आली..
म्हटल.. काय ही परिस्थिती झाली..

हाताशिवाय मी उतरेन तरी खाली..
पायाशिवाय तर ही अगदी अपंगच झाली..

तेवढ्यात पायावर पडला पाय.. मी म्हटलं
बघ बाई.. तुझाच की काय..?

ती म्हणाली.. खूप जोरात का पडला?
मी म्हटलं.. हो.. ती म्हणे - सापडला.. सापडला..

मीही मग अगदी हट्टालाच पेटले..
सारं बळ एकवटून मग जोरातच हलले..

ती कळवळली - म्हणाली - हाताचं कोपर लागतयं..
मी म्हटल मग - माझ्याच हाताचं वाटतयं..

तीही हसली गालात.. स्टेशनही आलं तेवढ्यात..
आणि हातापायासकट आम्ही दोघीही राहिलो आत.. !!


मंगळवार, ३ मार्च, २००९

सखे ग - प्राजक्ता खाडिलकर

.

नको नको ग संभाळू 
काजव्यांचे व्रण मुठी 
मूठ उघड.. होईल 
फुलपाखरांची दाटी..

नको नको सखे म्हणू 
वाट कुरतडलेली 
धुंदमदिर गंधाने 
पावलाला डसलेली..

पहाटेच्या वारियाला 
सांजचाहूल चाहूल 
नभवेलीवर खुळे
शुक्रचांदणीचे फूल.. 

अंधाराच्या गूढगर्भी 
रानजाई फुले फुले 
अन काजळडोहात 
सूर्यबिंब उमलले..

.

सोमवार, २ मार्च, २००९

ज्वालामुखी - श्रीपाद कोठे

.

वर्षं झालं
अजुनही आईच्या डोळ्यातलं
पाणी सरलं नाही
बाबांची शून्य नजर स्थिरावली नाही
येणारे जाणारे सुरूच आहेत
त्यात- भाऊ बहिणी आहेत,
नात्यागोत्याचे आहेत,
मित्र मैत्रिणी आहेत
आणि पोलिस अधिकारीही
पण सारेच चेहरे भकास...
पण आज असह्य झालं
आई आली चहाचा कप घेउन
आणि फेकून दिला मी
तिच्या हातातला कप
थरथरत उभी राहिली
कितीतरी दिवसान्नी आज पहिल्यांदाच,
लाखो ज्वालामुखी डोळ्यातून सांडत होते
अन् जिभेचा पट्टा सुरू झाला
- दांडपट्ट्यासारखा,
... नको मला काही
नको तुमचं खाण पिण
काळज्या करण
तुमचे मायेचे हात
आणि तुमचा अश्रुपात,
निघून जा
आणि कृपा करून बंद करा
ते संतत्वाचे शंढबोल...
माझ्यासाठी दु:ख करताहेत म्हणे !!
अरे एकही माईचा लाल नाही तुमच्यात
माझ्या पाठीवर मायेचा
हात फिरवतात म्हणे...
थू:,
एखाद्या हाताने सुरी फिरवली असती ना
त्या नराधमाच्या गळ्यावर
तर न फिरवताही
मायेचे शतसहस्र हात
फिरले असते पाठीवरून...
माझ्या हृदयातल्या लाखो ज्वालामुखींपैकी
एखादी ठिणगी तरी तुमच्या डोळ्यात
दिसली असती तर
दाह किंचित कमी झाला असता, कदाचित...
अरे बलात्कार कोणावर झालाय,
माझ्यावर की तुमच्यावर??
माझ्यावर आपबिती ओढवली
तेव्हाही मी प्रतिकार केला रे,
ओरबाडलं नखांनी
दातांनी चावे घेतले
जे शक्य झालं
ते सारं केलं प्रतिकारासाठी,
माझी शक्ती कमी पडली...
पण तुम्ही??
तुम्ही तर काही न होताच
लुळे पांगळे झालात...
छि:,
लाज वाटते मला तुमची,
आता मलाच निघायला हवं
नराधमाच्या नरडीचा घोट घ्यायला
आणि तुमच्या शंढत्वाची चिता रचायला...


.

रविवार, १ मार्च, २००९

अपघात - प्रभा प्रभुदेसाई

.


जाणारा तर निघून जातो.
कशाला ही उत्सुकता मग 
पाठी उरणारांना, मृताच्या दर्शनाची? 
दिसते का त्यांना
भवितव्यता त्या मृतदेहात
स्वतःच्याच नश्वर देहाची?

पाखरू पिंजर्‍यात गाताना
कुणीही त्या गीताची लकेर ऐकत नाही
सूर्य नभी तळपताना 
कुणाला त्याच्या अस्तित्वाची किंमत समजत नाही

उपेक्षित अपमानित 
उडतं मग पाखरू, चोच मिटून कायमची!
विझतो तो सूर्य, मिटून घेऊन स्वतःत 
तेजप्रभा प्राणांची!

बाह्यात्कारी मात्र,
जगाला दिसतो अपघात--
गाडीसमोर घडलेला!
न्याहाळतं जग उत्सुकतेने
रिकाम्या देहाचा, निर्जीव पिंजऱ्याचा,
तुकडा तुकडा विखुरलेला! 

खरंच त्या बघ्यांना 
दिसते का त्या मृतदेहात
भवितव्यता स्वतःची?

तरीही का मग करतात पूजा
पाखरू नाकारून पिंजऱ्याची,
सूर्यास डावलून आभाळाची;
आणि आत्मा नाकारून देहाची??

प्रभा प्रभुदेसाई
३०.४.१९७५.

.